मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांपुढे ‘राज’पुत्राने डोकं टेकलं
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी आज (मंगळवारी) मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. तसेच यावेळी त्यांनी मुंबईच्या समस्यांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. परंतु अमित ठाकरे यांना रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तरानंतर त्यांनी अक्षरश: त्यांच्यासमोर डोके टेकल्याचे पहायला मिळाले. त्यानंतर मनसेच्यावतीने त्यांना एक मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांच्यासह मनेसेचे शिष्टमंडळही उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान, अमित ठाकरे यांनी रेल्वेच्या महाव्यस्थापकांसमोर समस्यांचा पाढा वाचला. दरम्यान, त्यांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही महाव्यवस्थपकांसमोर मांडला. तसेच रेल्वेमध्ये महिला सुरक्षित नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्यात यावे आणि सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही वाढ करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच रेल्वेच्या मेगाब्लॉकवर आणि पावसाळ्यात रेल्वेच्या रखडपट्टीवर उपाय काढावे, रेल्वेच्या संख्यांमध्ये वाढ करावी, असेही त्यांनी नमूद केले. तसेच पहिल्या दर्जाच्या डब्यामध्ये होणाऱ्या गर्दीवरही त्यांनी लक्ष वेधले. तसेच या डब्यामध्ये एवढी गर्दी होते, तर या अधिक पैसे देऊन काढलेल्या पासचा उपयोग काय? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
रेल्वे सेवांबाबत वेळापत्रकाची नियमितता पाळावी, रेल्वे रद्द करण्याचे प्रमाण कमी करावे, गर्दीच्या स्थानकांदरम्यान विशेष लोकल चालवाव्यात, महिला प्रवाशांकरिता विशेष गाड्यांचे नियोजन करावे, प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवावीत, रेल्वे स्थानके आणि पादचारी पुलांवर गर्दीचे नियंत्रण आणि सुचना देण्यासाठी सुरक्षारक्षक नेमावे, अशा काही सुचना मनसेने निवेदनाद्वारेही केल्या आहेत.