आमदार, खासदारांसाठी शपथ घेण्याची मार्गदर्शक तत्त्वे ठरवून द्या – राज्यपालांची मागणी
मुंबई – महाराष्ट्रातील खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेमध्येत खासदारकीची शपथ घेताना ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिल्यामुळे वाद निर्माण झाला होता. यापूर्वीही महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या शपथविधीच्या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंत्री के. सी. पाडवी यांच्यासहीत अनेक मंत्र्यांना संतापून समज दिली होती. आता उदयनराजे यांच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी जय शिवाजी’ या घोषणा लिहिलेली दोन लाख पत्रे पाठविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नव्याने निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांना शपथ घेताना मार्गदर्शक तत्त्वे ठरवून द्या, अशी मागणी करणारे पत्र उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठविले आहे.
नव्याने निवडून आलेले आमदार आणि खासदार तसेच मंत्री पदाची शपथ घेणारे मंत्री निर्धारित प्रारूपातील शपथ न घेता त्यामध्ये आपल्या पक्षाच्या नेत्यांची तसेच आराध्य व्यक्तींची नावे जोडून शपथ घेतात. काही वेळा ‘जय हिंद जय महाराष्ट्र’, ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘जय भीम’, अशा घोषणाही देतात. यासंबंधात निश्चित अशी मार्गदर्शक तत्त्वे आणि आचारसहिता ठरवून देण्याची विनंती महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. शपथ ग्रहण विधीचे पावित्र्य व गांभीर्य जतन करण्यासाठी अशा प्रकारच्या मार्गदर्शक तत्त्वांची गरज असल्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी व्यंकय्या नायडू आणि ओम बिर्ला यांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.