मध्य महाराष्ट्रासह, विदर्भात गारपिटीचा इशारा
मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण विभागात बुधवारी (२९ एप्रिल) काही ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पुढील तीन दिवस राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी राहणार आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात सध्या चक्रिय वाऱ्यांची स्थिती आहे. त्याचप्रमाणे मध्य प्रदेशापासून तमिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा कार्यरत आहे. याचा परिणाम म्हणून राज्याच्या बहुतांश भागात पावसाळी स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी रात्रीपासूनच उकाडा वाढला होता. रात्रीचे किमान तापमान सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी पुढे गेले आहे. दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या आसपास आहे. दुपारनंतर अनेक ठिकाणी ढगाळ स्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस बरसला. गेल्या चोवीस तासांमध्ये मद्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, महाबळेश्वर, सांगली या भागात पावसाची नोंद झाली. विदर्भातील नागपूरसह काही ठिकाणी पाऊस बरसला.
पुढील तीन दिवसांमध्ये राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे. ३० एप्रिलला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या दिवशी कोकण, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. १ मे रोजी विदर्भात काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. या दिवशी मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
पाऊस कोणत्या जिल्ह्यांत?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवसांमध्ये राज्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाळी स्थिती राहणार आहे. अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस होणार आहे. प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागांसह विदर्भातील अनेक ठिकाणी वादळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. पुणे, नगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्य़ांतही पावसाची हजेरी असणार आहे.