भ्रमात राहू नका वाजपेयींचं सरकार एका मताने पडलं होतं, सेनेचा भाजपला गर्भित इशारा
राज्यात मुख्यमंत्री पद कुणाला द्यायचं यावरुन भाजप आणि शिवसेनेत जोरदार खडाजंगी सुरु आहे. भाजपा आणि शिवसेनेत कोणीही माघार घेण्यास तयार नाही. ठाकरे घराण्यातील पहिली व्यक्ती आदित्य ठाकरेंच्या रुपाने आमदार असून आता त्यांना मुख्यमंत्री बनविण्याच्या हालचाली सुरु आहेत. हे सर्व पाहता मुख्यमंत्री पद आमच्याकडेच राहील हे भाजपाने स्पष्ट केले.
यातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला गर्भित इशारा दिला आहे. लक्षात ठेवा वाजपेयीचं सरकार एका मताने पडलं होतं. त्यामुळे जर कुणी म्हणत असेल की, माझ्याकडे १०० जागा आहेत आणि मी अल्पमतातील सरकार चालवू शकतो. तर ते चुकीचं आहे. कारण आपल्या देशात जी संसंदीय पद्धत आहे त्यामध्ये ही गोष्ट शक्य नाही.’ असं म्हणत शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी भाजपला एक गर्भित इशाराच दिला आहे.
‘जे ठरलं आहे तेच व्हायला पाहिजे. युतीला तडा जाईल ते आमच्याकडून घडणार नाही. उद्धव ठाकरे हे संयमी आणि सरळमार्गी नेते आहेत. त्यामुळे ५०-५० हा फॉर्म्युला लोकसभेलाच ठरला होता. पण मला आता कळत नाही की, अद्याप काय सुरु आहे. कारण याबाबत कोणतीही चर्चा सुरु झालेली नाही. मला माहिती आहे की, अमित शहा यांच्यासोबत उद्धव ठाकरेंची चर्चा झाली होती. अमित शहा हे प्रखर राम भक्त आहेत. राम सत्यवचनी आणि एकवचनी आहे. त्यामुळे ते योग्य तोच निर्णय घेतील. राज्यात निवडणुकीत युती होती. आता बहुमतही आहे. त्यामुळे ठरल्याप्रमाणेच व्हायला हवं.’ असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपला दिल्या वचनाची आठवण करुन दिली आहे.