जम्मू-काश्मीरच्या समतोल विकासाच्या स्वप्नाचा दबावगटांकडून भंग
अमित शहा : ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्था स्थितीवर ठेवले बोट
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीर सरकारचे नेतृत्व करणाऱ्या पीडीपीचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय भाजपने घेतल्यानंतर त्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज प्रथमच त्या घडामोडीवर भाष्य केले. जम्मू-काश्मीरच्या तिन्ही विभागांचा समतोल विकास करण्याच्या भाजपच्या स्वप्नाचा दबावगटांनी भंग केल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, पक्षाच्या निर्णयासाठी काश्मीर खोऱ्यातील ढासळत्या कायदा आणि सुव्यवस्था स्थितीचे कारण दिले.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शहा यांनी भाजपची भूमिका मांडली. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरात सरकार स्थापन करण्यासाठी 2015 मध्ये पीडीपीशी युती करण्याच्या भाजपच्या निर्णयाचे जोरदार समर्थन केले. कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने इतर कुठलाच पर्याय नव्हता. पीडीपी बरोबर भाजप गेल्याचा जनतेला आनंद झाला. आता पाठिंबा काढून घेतल्यानेही जनतेला आनंदच झाल्याचे त्यांनी म्हटले.
केंद्राकडून राज्य सरकारला निधी पाठवण्यात आला. मात्र, काश्मीरी पंडितांच्या आणि पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्यांच्या पुनर्वसनासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना अल्पसे यश मिळाले. विविध आघाड्यांवर मिळणाऱ्या यशाची आम्ही किती काळ प्रतीक्षा करू शकणार होतो, असा सवाल त्यांनी केला. पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक ध्यानात घेऊन पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय झाला नसल्याचा दावा शहा यांनी केला. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवली असती तर आणखी सहा महिन्यांनंतर ते पाऊल उचलले असते, असे त्यांनी म्हटले.