भीमा-कोरेगावचा तपास NIA कडे दिलाच नाही – उद्धव ठाकरे
सिंधुदुर्ग | भीमा-कोरेगाव दंगलप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एनआयएकडे तपास वर्ग केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख हे नाराज झाले असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, आता याबाबत उद्धव ठाकरे यांनी वेगळंच स्पष्टीकरण दिलं आहे. ‘मी भीमा-कोरेगावचा तपास केंद्राकडे दिलेला नाही. देणार देखील नाही. मी दलितांवर अन्याय होऊ देणार नाही. मी एल्गार परिषदेचा विषय एनआयएकडे वर्ग केला आहे.’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भीमा-कोरेगाव दंगलीप्रकरणातील मूळ सूत्रधाराला बाजूला ठेवून प्रतिष्ठित अशा लोकांना अटक करण्यात आली, हे म्हणजे तत्कालीन सरकारनं घडवून आणलेलं षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता.
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून पवारांनी कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती. पोलीस तपास यंत्रणांनी कंप्युटर आणि त्यासंबंधी दस्ताऐवजांसोबत छेडछाड केली, पुरावे नष्ट केले आणि खोटे पुरावे तयार केले, असे आरोप होत असल्यामुळे याप्रकरणाची खोलात जावून चौकशी करण्याची गरज असल्याचं शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.
कोरेगाव-भीमा दंगलीला एल्गार परिषदेतील चिथावणीखोर जबाबदार असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. त्यानंतर काही बुद्धीजीवी लोकांचा संबंध नक्षलवाद्यांशी आहे म्हणत त्यांच्यावर कारवाई झाली. म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी, असं शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं.