भारत-चीन सीमेवरील तणाव, शरद पवारांची माजी हवाईदल प्रमुख आणि माजी परराष्ट्र सचिवांशी चर्चा
मुंबई: भारत चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशाच्या माजी हवाईदल प्रमुख आणि माजी परराष्ट्र सचिवांशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी भारतीय उपखंडाला सर्व दिशांनी चीन वेढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत-चीन सीमेवर तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोमवारी 31 ऑगस्टला चीनी लष्कराने पूर्व लडाखमधील सीमेवरील सहमतीचे उल्लंघन केलेले होते. चिनी सैनिकांनी प्रक्षोभकपणे सीमेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय सैनिकांनी सडेतोड उत्तर देत त्यांना रोखले, असे भारत सरकारने स्पष्ट केलेलं होतं.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी भारताचे माजी हवाईदल प्रमुख भूषण गोखले आणि माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण उपस्थित होते. भारतीय उपखंडाला चीन सर्व दिशांनी वेढत आहे. तसेच दक्षिण चीन समुद्रात चीनच्या हालचाली वाढल्या आहेत, याबाबत शरद पवारांनी चिंता व्यक्त केलेली आहे.
त्याचबरोबर नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये चीनचा वाढत्या हस्तक्षेपावर लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. भारताची आर्थिक वाढ थांबवण्याचे चीनचे धोरण असल्याचे म्हणणं शरद पवारांनी व्यक्त केलं आहे.