वाराणसीत गंगा नदीला महापूर, मृतदेहांना घरांच्या छतावर अग्नी देण्याची वेळ
लखनौ: वाराणसीत गंगा नदीचं महाविक्राळ रुप पाहायला मिळत आहे. गंगेच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होत चाललेली आहे. सध्या गंगेची पाणी पातळी 68 मीटरपर्यंत पोहोचली आहे. वाराणसीमध्ये गंगा नदीची इशारा पातळी 71.26 मीटर तर धोका पातळी 73.90 मीटर इतकी आहे. दशाश्वमेध घाटावर असलेल्या शीतला माता मंदिराच्या संपूर्ण पायऱ्या पाण्याखाली गेलेल्या आहेत. अनेक छोट्या मोठ्या मंदिरांमध्येदेखील पाणी शिरलेलं आहे. वाराणसीतल्या स्मशानभूमींमध्ये पाणी शिरल्याने अनेक मृतदेहांना घराच्या छतावरच अग्नी देण्याची वेळ आलेली आहे.
वाराणसीच्या काठावर रोज 60 ते 70 मृतदेह अग्नी देण्यासाठी आणले जातात, मात्र सध्या आलेल्या भीषण पुरामुळे अनेक लोकांना वाट पाहात ताटकळत उभे राहावं लागत आहे. जौनपूर, भदोही, मिर्जापूर, गाजीपूर, सोनभद्र, बलिया, गोरखपूर, पूर्वांचल अशा आसपासच्या अनेक जिल्ह्यातून लोक दशाश्वमेध घाटावर येऊन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत असतात. मात्र नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे हे करणं अशक्य झालेलं आहे. त्यामुळे जिथे मोकळी जागा मिळेल तिथे अनेक मृतदेहांना अग्नी दिला जात आहे, तर अनेकांनी घरांच्या छतावरच मृतांना अग्नी देण्यास सुरूवात केलेली आहे.