भारत आणि सिंगापूरमधील संबंध सर्वात निकटचे
- पंतप्रधान मोदी यांचे भारतीय समुदायापुढे भाषण
सिंगापूर – भारत आणि सिंगापूरमधील संबंध हे नेहमीच सौहार्दाचे आणि निकटचे राहिले आहे. यापुढच्या काळातही दोन्ही देश मिळून भविष्यातही एकत्रच असतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. तीन देशांच्या आपल्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये ते काल सिंगापूरमध्ये दाखल झाले. भारत आणि सिंगापूरदरम्यानचे संबंध सर्वात मजबूत संबंधांपैकी आहेत आणि दोन्ही देश मिळून आताच्या काळाला अनुसरून भागीदारीचे संबंध निर्माण करत आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. एका उद्योग प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी भारतीय समुदायाच्या नागरिकांना संबोधित करताना ते बोलत होते.
भारत आणि सिंगापूरमध्ये कोणतीही स्पर्धा, दावा, तक्रार किंवा शंका वाटावी असे संबंध नाही. सामायिक दृष्टीकोनातून केलेली ही नैसर्गिक भागीदारी आहे, असे मोदी म्हणाले. “जेंव्हा भारत जगासाठी खुला झाला तेंव्हा सिंगापूर भारताचा भागीदार बनला. भारत आणि आसियान संघटनेमध्ये सिंगापूर हा दुवा बनला.’ असे म्हणून पंतप्रधानांनी सिंगापूरच्या सहकार्याबाबत समाधान व्यक्त केले. सिंगापूरच्या नौदलाच्या जहाजांना भारत नेहमीच थांबण्यास परवानगी देत असतो. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर दोन्ही देश नेहमीच एकाच स्वरात बोलत असतात. जणू दोन सिंह एकाच भविष्याच्या दिशेने एकत्र पावले टाकत असतात, अशी प्रतिमाही पंतप्रधानांनी वापरली.
यावेळी भारताच्या प्रगतीचा आलेखही पंतप्रधानांनी भारतीय समुदायासमोर मांडला. भारताची अर्थव्यवस्था आता स्थिर झाली आहे आणि या अर्थव्यवस्थेतील सुधारणा वेगाने होत आहेत. भारतात वेगाने होत असलेल्या सुधारणा आतापर्यंत कधीही झालेल्या नव्हत्या. उद्योगसुलभतेच्या यादीत भारताचा क्रमांक 42 वर सरकला आहे. उद्योगसुलभतेसाठी कालबाह्य झालेले 1,400 जूने कायदे रद्द करण्यात आले आहेत. देशातील रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे असलेल्या पायाभूत सुविधांचा विस्तार विक्रमी वेगाने होतो आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.