भारतीय जवानांच्या जेवणात विष मिसळण्याचा आयएसआयचा ‘कट’
नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या हवाई दलाने थेट पाकिस्तानात घूसुन ३५० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर पाकिस्तानकडून झालेला हवाई हल्ला सुध्दा भारताने परतवून लावला. तरीही सीमेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरुच आहे. यामुळे भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. मात्र पाकिस्तानच्या सर्व कारवायांना भारताकडून चोख प्रतिउत्तर दिले जात असून भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाकिस्तानची कोंडी केली आहे. यामुळे कुठेही डाळ शिजत नसल्याने पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने ‘विषप्रयोगाचा’कट रचल्याचे उघडकीस आले आहे.
दहशतवादी संघटनांना मदत करण्यासाठी ‘द इंटर -सर्व्हिसेस इंटेलिजेन्स’ (आयएसआय) या पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेने विष प्रयोग करण्याचे मोठे षडयंत्र रचल्याचे समजते. सुत्रांच्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा दलाच्या रेशन स्टॉकमध्ये विष कालवून मोठ्या प्रमाणावर नरसंहार करण्याचा प्लान पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयकडून करण्यात आल्याचे समजते.
भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांवर विष प्रयोग करण्यासाठी आयएसआय आपल्या काश्मीरमधील एजंटचा वापर करु शकेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीरसह देशभरातील सर्व भारतीय सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय भारतीय गुप्तहेर संस्थेला मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली, मुंबईतील उपनगरीय रेल्वेसह देशातील अनेक शहरातील महत्त्वाची ठिकाणे दहशवाद्यांच्या निशाणावर आहेत. त्यामुळे सर्व प्रमुख शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.