भारतीय अभियंत्यांच्या सुटकेसाठी प्रयत्नांची शर्थ करू
- अफगाणिस्तानच्या विदेश मंत्र्यांचे भारताला आश्वासन
काबुल – अफगाणिस्तानात कार्यरत असलेल्या सात भारतीय अभियंत्यांचे तेथील गनिमांनी अपहरण केले आहे. त्यांच्या सुटकेसाठी सर्व शक्य ते प्रयत्न करू अशी ग्वाही अफगाणिस्तानचे विदेश मंत्री सल्लाउद्दीन रब्बानी यांनी भारताला दिली आहे. रब्बानी यांनी काल अफगाणिस्तानातील भारतीय दूताची भेट घेऊन या घटनेबद्दल दुख: व्यक्त करताना त्यांच्या सुटकेसाठी हे प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे. ते म्हणाले की संबंधीत समाजातील ज्येष्ठ मंडळींची मदत घेऊन या अपहरणकर्त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले जात आहेत.
स्वत: रब्बानी यांनी कालच भारताच्या विदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी फोन वर संपर्क करून त्यांना सुटकेसाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. हे भारतीय अभियंते एका पॉवर सबस्टेशनच्या उभारणीचे काम करीत होते. चेष्मा ए शेर भागातून त्यांचे गेल्या रविवारी अपहरण करण्यात आले होते. तालिबानच्या अपहरणकर्त्यांनी हे कृत्य केले असावे असा कयास व्यक्त केला जात आहे.