‘भारत-चीनने वादांवर संवादातून तोडगा काढावा’
- चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग शुक्रवारी भारतात
नवी दिल्ली : भारत आणि चीन यांनी संवादातून प्रश्न सोडवून सीमेवर शांतता आणि स्थर्य कायम राखावे, असे मत चीनचे राजदूत सून वेईडोंग यांनी मंगळवारी व्यक्त केले.
चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग ११ ऑक्टोबर रोजी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर वेईडोंग यांनी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत द्विपक्षीय संबंधांना स्पर्श करणाऱ्या अनेक मुद्यांवर भाष्य केले.
शेजारी देशांमध्ये अनेक मुद्यांवर वाद असणे साहजिक आहे. भारत आणि चीन यांनी याआधी प्रादेशिक पातळीवर अनेक प्रश्न सोडवले आहेत. सीमावादामुळे द्विपक्षीय संबंध बिघडू नये, याची काळजी उभय देशांनी घ्यायला हवी, असे वेईडोंग म्हणाले. दरम्यान, दुसऱ्या भारत-चीन प्रस्तावित शिखर परिषदेची अनिश्चितता मंगळवारी संपुष्टात आली. चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग हे ११ आणि १२ ऑक्टोबर रोजी भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत आणि चीन बुधवारी या भेटीची अधिकृत घोषणा करणार आहेत. राजनैतिक अधिकाऱ्यांद्वारे चीनने भारताला ही माहिती कळविली आहे. जम्मू-काश्मीरबद्दल चीनची भूमिका स्पष्ट आणि कायम असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे. काश्मीरच्या प्रश्नावर चीनचा पाकिस्तानला पाठिंबा आहे. चीनही तेथील जनतेला न्याय मिळण्यासाठी काम करीत आहे, असे चीनचे पाकिस्तानमधील राजदूत याओ जिंग यांनी म्हटले होते. काश्मीरसह सर्व प्रश्नांवर चर्चा करावी असे आवाहन आम्ही भारत आणि पाकिस्ताला केले असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी मंगळवारी सांगितले. चीनचे पाकिस्तानमधील राजदूत जिंग यांनी काश्मीरबद्दल वक्तव्य केल्याबद्दल भारताने शनिवारी राजनैतिक मार्गाने निषेध नोंदवला होता.