भाजप-शिवसेना युतीनंतर खासदार आढळराव पाटलांच्या भूमिकेत बदल
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भाजप आणि शिवसेना युती झाल्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्ते एकत्रपणे युतीचे काम करणार आहेत. त्यामुळे भोसरीतील नात्या-गोत्याची कितीही चर्चा झाली तरी माझ्यावर त्याचा कसलाही परिणाम पडणार नाही. आमदार महेश लांडगे लोकसभा निवडणुकीत माझेच काम करतील, यावर माझा विश्वास आहे. त्यांना भेटून प्रचार करण्याबाबत चर्चा सुध्दा केली जाणार आहे, असे सुधारित भूमिका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी माध्यमांसमोर मांडली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत खासदार आढळराव पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, महिला संघटिका सुलभा उबाळे, नगरसेवक अमित गावडे, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत शिरूरमधून शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील विरूध्द राष्ट्रवादीकडून विलास लांडे असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार विलास लांडे आणि भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांच्यातील ‘नात्या-गोत्या’मुळे दोघांत दिलजमाई झाल्याची चर्चा रंगली होती. या शक्यतेमुळे सलग तीन वेळा खासदार झालेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग खडतर झाल्याचे बोलले जात आहे.
आमदार महेश लांडगे माझंच काम करतील
यावर बोलताना खासदार आढळराव पाटील म्हणाले की, शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षाची युती झाली आहे. आमदार महेश लांडगे अपक्ष आमदार असले तरी भाजपाच्या अर्थात युतीच्या विचाराचे आहेत. लोकसभा मतदारसंघातील युतीच्या प्रत्येक आमदाराला सोबत घेऊन प्रचार करणार आहे. महेश लांडगे यांच्यावर मी कधीच वैयक्तीक टिका केली नव्हती. युती झालीय मनं नक्कीच जुळून येतील. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांची एकत्र काम करण्याची मानसिक तयारी झाली आहे. देशावर लष्करी संकट आहे. आता नरेंद्र मोदींच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याची गरज आहे. युतीसाठी मी आग्रही होतो, स्वत:साठी नव्हतो. काँग्रेस, राष्ट्रवादीला सत्तेत येण्याची संधी न देण्यासाठीच एकत्र लढणे फायद्याचे ठरणार आहे. हिंदुत्ववादी मतांची विभागणी होऊ नये, म्हणून युती झालीय. भोसरी मतदार संघाचा विकास झालायं. महेश लांडगे यांच्यावर मी कधी वैयक्तीक आरोप केले नाहीत. कामातील काही गोष्टी आवडल्या नाही त्या समोरासमोर मांडल्या असं सांगत महेश लांडगे माझाच प्रचार करतील असं खासदार आढळराव पाटील यांनी शेवटी म्हणाले.