भाजपाच्या पराभवाचा सिलसिला आता थांबणार नाही- शरद पवार
पुणे | महाईन्यूज
दिल्लीचा निकाल हा अपेक्षित होता. मात्र आता आम्ही उर्वरित पक्षांनी एकत्र बसून काम करायला हवे. आज लोकांना एका विचाराच्या अपेक्षा आहे असं सांगतानाच ‘भाजप देशावरची ही आपत्ती आहे’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात केले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी दिल्ली निवडणुकीसह इतर विषयांवरही मत व्यक्त केले. पुढे पवार म्हणाले की, ‘या निकालात काहीही आश्चर्य नाही.लोकांनी विकासाला मत दिले आहे. मात्र दिल्लीचा निर्णय हा दिल्लीपुरता नसून हे इतर राज्यांमध्येही होऊ शकते.धार्मिक प्रचाराला ठोकारलं आहे, ही अहंकाराला चपराक आहे. ही प्रक्रिया आता सुरु झाली असून अनेक राज्यात भाजपचा पराभव झाला आहे. आम्ही लोकांना पर्याय दिला पाहिजे’ असेही ते म्हणाले.यासाठी किमान समान कार्यक्रम घेऊन काम करणे गरजेचे असून विरोधकांनी एकत्र यायला हवे असा विचारही त्यांनी मांडला आहे.