भाजपच्या कार्यकाळात सर्वाधीक बेरोजगारी वाढली – धनंजय मुंडे
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – दर वर्षी दोन कोटी नोक-या देण्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी 2014 रोजी दिली होती. एकाला सुध्दा नोकरी मिळाली नाही. सत्ताधा-यांच्या साडेचार वर्षाच्या कार्यकाळात सर्वात जास्त बेरोजगारी निर्माण झाल्याचा अहवाल एका संस्थेने दिला आहे. त्यामध्ये लाखो तरुणांची मोदींनी फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे, अशी घणाघाती टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगवीत केली.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीने निर्धार परिवर्तनाची मोहिम सुरू केली आहे. सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर जाहीर सभेत मुंडे बोलत आहेत. व्यासपीठावर नेते अजित पवार, माजी मंत्री छगन बुजबळ, नेते दिलीप वळसे पाटील, युवा नेते रोहीत पवार, पार्थ पवार, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, युवा येते संदीप पवार, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, भाऊसाहेब भोईर, नाना काटे आदी उपस्थित आहेत.
मुंडे म्हणाले की, देशाचा चौकीदार असे मोदींनी स्वतःला म्हणवून घेतले. परंतु, आज इमानदारीने चौकीदार म्हणून नोकरी करणा-यांना लाज वाटू लागली आहे. त्यांच्यासह नागरिकांना उपासमारीची वेळ आली आहे. शेतक-यांना कर्जमाफी दिली नाही. मराठा, धनगर, मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. एकाला सुध्दा आरक्षण दिले नाही. एका सर्वेक्षणामध्ये सर्वाधीक बेरोजगारी वाढल्याचा अहवाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये सर्वात जास्त बेरोजगार होण्याची वेळ तरुणांवर या साडेचार वर्षांत आली आहे, अशी टिका त्यांनी केली.
ऑनलाईन अर्ज भरताना सरकारनं खुट्टी मारली
कर्जमाफीचे फॉर्म ऑनलाईन भरताना शेतक-यांनं पत्नीला सोबत आणण्याची अट सत्ताधारी भाजपने घातली. पत्नीला सोबत आणण्याची अट विनाकारण घातली गेली. कर्जमाफी दिलीच नाही. त्यामुळे एकही शेतकरी समाधानी नाही. कारण, राज्यातील मंत्रीमंडळात एकही शेतक-याचं लेकरू मंत्री नाही. म्हणून शेतक-यांचे प्रश्न सुटत नाहीत. गिरीष बापट, गिरीष महाजन, चंद्रकांत पाटील शेतकरी दिसतात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सर्वच खात्यात भ्रष्टाचार वाढला
पंधरा वर्षांच्या नवसानं सरकार आलं आहे. त्यात हे मंत्री, आमदार घोटाळं करत सुटले आहेत. कोणत्याही खात्यात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. फसणवीस या मंत्र्यांना आवर घाला. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. राज्यातल्या गरजू कष्टक-याला पिंपरी-चिंचवडन तारलं. आणि या शहराला पवार साहेबांनी वाढवलं आहे. या लबाड लांडग्यांनी पाठीमागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्हाला फसवलं आहे. वचनपूर्ती केली का सरकारनं हे स्वतःच्या मनाला विचारा.