बोपखेल पुलाचे काम आचारसंहितेपूर्वी सुरू करा – नगरसेविका हिराबाई घुले
पिंपरी ( महा ई न्यूज ) – बोपखेल गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी मुळा नदीवरील पुलाच्या खर्चाचा प्रस्ताव स्थायी समिती सभेसमोर सादर करुन तो प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका हिराबाई घुले यांनी स्थायी समितीकडे केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या पुलाचे काम सुरू करावे, असेही त्यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
यासंदर्भात नगरसेविका हिराबाई घुले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलवासीय वर्षानुवर्षे दापोडी येथील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करत होते. परंतु, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १३ मे २०१५ रोजी सीएमईने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. तेव्हापासून बोपखेलवासीयांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे महापालिकेमार्फत मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोणारा पूल उभारण्याचा आणि रस्ता करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात आवश्यक खर्चाची तरतूदही करण्यात आली आहे. तसेच या कामाची निविदा प्रसिद्ध करून त्यावर योग्य ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केलेले अनेक प्रयत्न आणि पाठपुराव्यानंतर अखेर बोपखेलवासीयांच्या रहदारीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. महापालिकेने मुळा नदीवर पूल उभारण्याच्या कामासाठी ४५ कोटी ४६ लाख ३९ हजार १२२ रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. निविदा प्रक्रिया पूर्ण करून आता त्याला स्थायी समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे अंतिम टप्प्यात आहे. आपण त्याचा पाठपुरावा करून उड्डाणपुलाच्या कामाला आणि त्याच्या खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव तातडीने स्थायी समितीसमोर सादर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करावी. त्यानंतर प्रशासनाने ठेवलेल्या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये तत्काळ मंजुरी देऊन बोपखेलवासीयांचा वनवास संपवावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “बोपखेल उड्डाणपूल कामाच्या खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाकडून मागवून स्थायी समितीमार्फत खर्चाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी सभापती ममता गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे. सभापती गायकवाड यांनी बोपखेलवासीयांनी आतापर्यंत भोगलेला त्रास पुन्हा त्यांच्या वाटेला येणार नाही, असा विश्वास दिला आहे. बोपखेलचा पूल आणि रस्त्याच्या कामाच्या खर्चाला स्थायी समितीत तातडीने मंजुरी देण्यात येईल. तसेच आणखी निधी लागल्यास महापालिका कमी पडून देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. बोपखेलचा पूल उभारण्याच्या खर्चाला स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर प्रशासनाने संबंधित ठेकेदारांसोबत समन्वय साधून कामाला तातडीने सुरूवात करावी. तसे आदेशही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना आपण स्वतः चर्चा करून द्यावेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात करावी. तसेच हे काम उच्च दर्जाचे व्हावे यासाठी प्रशासनाने डोळ्यात तेल घालून कामावर देखरेख ठेवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.”