देशात आणखी लशींची निर्मिती होणार! आरोग्यमंत्र्यांची घोषणा
नवी दिल्ली – देशात आतापर्यंत कोरोनाच्या दोन लशींची निर्मिती करण्यात आली असून आता देशात कोरोना प्रतिबंधासाठी आणखी सहाहून अधिक लशींची निर्मिती होणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी शनिवारी केली.
वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,13,59,048 वर
भोपाळ येथील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रीसर्च एनव्हायर्नमेंटल हेल्थ’च्या नव्या ग्रीन कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी आरोग्यमंत्री बोलत होते. यावेळी पूर्वी देशात कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी एकच प्रयोगशाळा होती, मात्र आता आपल्याकडे अशा २,४१२ प्रयोगशाळा आहेत, याचा उल्लेख हर्ष वर्धन यांनी केला. आतापर्यंत कोरोनाच्या २३ कोटी चाचण्या झाल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. तसेच देशात आतापर्यंत कोरोनाच्या दोन लशींची निर्मिती करण्यात आली असून त्या ७१ देशांना देण्यात आल्या आहेत. आणखी अनेक देश लशींची मागणी करत आहेत. कॅनडा, ब्राझील आणि इतर विकसित देशही भारतीय लशींचा उत्साहाने वापर करत आहेत, असे हर्ष वर्धन म्हणाले.
त्याचबरोबर विज्ञानाचा आदर करा. कोरोनाविरुद्धचा लढा हा वैज्ञानिक लढा आहे, राजकीय नाही. त्यामुळे लशीवरून होणारे राजकारण बंद करण्याची आवश्यकता आहे, असेही हर्ष वर्धन म्हणाले. तसेच देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबद्दल हर्ष वर्धन म्हणाले की, ‘निष्काळजीपणा आणि गैरसमजुतींमुळे संसर्गात वाढ होत आहे. लस आल्यामुळे आता सगळे काही ठीक होईल, असे लोकांना वाटते. परंतु संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहे’, असे त्यांनी सांगितले.