बॉलिवूड अभिनेत्री कंगनाला हिमाचल प्रदेश सरकारकडून सुरक्षा
मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात सध्या तुफान शाब्दिक चकमक सुरू आहे. त्यातच कंगना राणावत येत्या ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. तिच्या या प्रवासासाठी हिमाचल प्रदेश सरकारकडून तिला सुरक्षा देण्यात आली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी स्वतः रविवारी याबाबत माहिती दिली.
भाजपा आमदारांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘कंगना ही हिमाचल प्रदेशची कन्या असून ती एक नामवंत व्यक्ती आहे. तिला सुरक्षा देणे ही आमची जबाबदारी आहे.’ त्याचबरोबर ९ सप्टेंबरच्या प्रवासासह राज्यभरात इतर कोणत्या ठिकाणी कंगनाला सुरक्षेची आवश्यकता आहे, याबाबत विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
कंगना राणावतची बहीण रंगोलीने माझ्याशी फोनवरून संवाद साधून व कंगनाच्या वडिलांनी हिमाचल पोलिसांना अधिकृत पत्र लिहून तिला सुरक्षा देण्याची मागणी केल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचेही ठाकूर यांनी म्हटले.
दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येवर कंगनाने केलेल्या वक्तव्यांबाबत आणि कंगना व संजय राऊत यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीबाबत काहीही बोलण्यास मुख्यमंत्री ठाकूर यांनी नकार दिला.