बॉलिवूडची थाली घाणेरडीच असेल तर छेद केलाच पाहिजे: कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम
मुंबई | अभितेना सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्ज अँगल समोर येताच नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) सक्रीय झाले आणि पाठोपाठ बॉलिवूडच्या दिग्गज कलाकाराची नावे समोर आली आहे. याबाबत एनसीबीने अभिनेत्रींना समन्स पाठवला आहे.
याचाच धागा पकडत कायदे तज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी याबाबत स्पष्ट भाष्य केले आहे. तसेच ‘जिस थालीमें खाते हैं उस थालीमें छेद करते है’ हे वक्तव्य जया बच्चन यांनीच काही दिवसांपूर्वी संसदेत केले होते. याच बाबत निकम यांनी जया बच्चन यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.
याबाबत बोलताना निकम म्हणतात, ‘एका अभिनेत्रीने संसदेत मध्यंतरी असे भाष्य केले की ‘जिस थालीमें खाते हैं उस थालीमेंही छेद करते हैं! आता सगळीच तुमची थाली घाणेरडी असेल तर छेद केलाच पाहिजे,’ असे निकम यांनी म्हंटले आहे.
तसेच ‘एनसीबीने संपूर्ण ड्रग्ज प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी केली पाहिजे. ज्या बॉलिवूड कलाकारांची नावे या ड्रग्ज कनेक्शनमध्ये समोर आली आहेत त्यांनी मनाची श्रीमंती दाखवून आपण जे कृत्य केले आहे ते कबूल करावे,’ असे निकम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सुशांतच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करताना रिया चक्रवर्ती ड्रग्स मागवत असल्याची माहिती समोर आली. यानंतर एनसीबीच्या तपासात बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांची नावं समोर आली. ड्रग्स प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांची नावं पुढे आली आहे.