बैल पोळ्याला तरी बैलाला सुट्टी मिळते, मात्र चौदा वर्षात एक ही सुट्टी घेतली नाही- शरद पवार
पुणे:- बैल पोळ्याला बैलाला एक दिवस तरी सुट्टी मिळते मात्र गेली चौदा वर्ष झालं एक सुट्टी घेतली नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप मोहिते यांनी ही शेवटची निवडणूक असल्याचे आपल्या भाषणात सांगितले. तोच धागा धरत शरद पवार म्हणाले मी चौदा निवडणूक लढलो आहे. कोणी घरी पाठवलं नाही. तुम्ही पाचव्यावर थांबताय अस म्हणत चौदा वर्षात एक ही सुट्टी घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले ते चाकणमध्ये जाहीर सभेत बोलत होते.
शरद पावर म्हणाले, दिलीप मोहितेंनी जाहीर केलं आता निवडणूक लढणार नाही. मी विचारलं किती निवडणूक झाल्या ते म्हणाले ही पाचवी आहे. मी ही ठरवलं आहे लढवायची नाही. माझ्या १४ निवडणूक झाल्या तुम्ही पाचव्यावरच थांबताय? सात लोकसभा आणि सात विधानसभा लढलो आहे. मात्र, कोणी घरी पाठवत नाही. बारामतीच्या मतदारांना सांगितलं की बैलपोळाच्या दिवशी तरी त्याला सुट्टी मिळते. पण आम्हाला चौदा वर्षात एक ही सुट्टी नाही. हे वागणं बरय का? अस म्हणताच उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हशा पिकला.
पुढे ते म्हणाले की, तामिळनाडूमध्ये गेलात तर त्या ठिकाणी बैलगाडी शर्यत सुरू आहे. त्या ठिकाणी बंदी नाही मग महाराष्ट्रात काय घोड मारलं? असा सवाल सत्ताधाऱ्यांना पवार यांनी केला. इथल्या बैलगाडी शर्यतीला परवानगी नाही. मध्यंतरी बैलगाडा संघटनेचे लोक आले. त्याचे जे मंत्री आहेत त्यांच्या घरी घेऊन गेलो. खेड, जुन्नर, आंबेगाव येथील लोकांना आनंद देणारा बैलगाडा स्पर्धा आहे, त्यांच्यावरील बंदी काढून टाका. काढतो म्हटले, पण अजून काही केलेलं नाही. मी तुम्हाला खात्री देतो. सरकार बदला, राज्यसरकार पाठिंबा देत नाही. त्याच्यामुळे हा घोटाळा झाला आहे. तामिळनाडू च्या सरकारने केंद्राला दम दिला. हे तुम्ही केलं नाही तर आम्ही काय करायचं ते करू. त्यामुळे तेथे कारवाई झाली नाही. बैलगाडा सुरू राहील. फडणवीस सरकार ला काय पडलंय, त्यांना बैलांची माहिती नाही बैगाड्याची माहिती नाही. त्यामुळे त्यांचं लक्ष याच्यामध्ये नाही. याचमुळे बैगाड्याचा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे तुम्ही सर्व जण परिवर्तन करा अस पवार म्हणाले.