बीएसएनएल, एमटीएनएल कर्मचाऱ्यांना अद्यापही ऑगस्ट, सप्टेंबरचं वेतन नाही
बीएसएनएल, एमटीएनएल या सरकारी कंपन्यांची स्थिती अद्यापही बिकट बनली आहे. या दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांचं वेतन अद्यापही मिळालेलं नाही. तसंच कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण असून वेतन न मिळाल्यास दिवाळीनंतर देशव्यापी संपाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
एमटीएनएल आणि बीएसएनल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचं वेतन अद्यापही मिळालं नसल्याची माहिती कामगार संघटनांच्या नेत्यांकडून देण्यात आली. दिवाळीपूर्वी वेतन न मिळणं हे योग्य नाही. आम्हाला वेतन मिळालं नाही तर आम्ही शांत बसणार नाही. आम्ही पंतप्रधान कार्यालयापर्यंत हा विषय नेऊ, असा इशारा एमटीएनएल कर्मचारी संघटनेच्या धर्मराज सिंह यांनी दिला. टाईम्स ऑफ इंडियानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
एमटीएनएल कर्मचाऱ्यांसोबत मिळून आपण संप करणार असल्याची माहिती बीएसएनएल कर्मचारी संघटनेचे नेते के. सबेस्टीयन यांनी दिली. तसंच कंपन्यांना नवसंजीवनी देण्यासाठी सरकार काय प्रयत्न करत आहे, याचीदेखील माहिती घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचं वय ६० वरून ५० करण्यात येऊ नये, अशी मागणीही कर्मचाऱ्यांनी केली आहे. याव्यतिरिक्त एमटीएनएल आणि बीएसएनएलच्या विलिनीकरणाचाही कर्मचाऱ्यांकडून विरोध करण्यात आला आहे.