बिहार मध्ये मोठ्या प्रमाणात होतो भ्रष्टाचार
भाजपच्या या मंत्र्याचा पक्षालाच घरचा आहेर
पिंपरी |टीम ऑनलाईन
बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो, असे खळबळजनक वक्तव्य बिहारमधील नितीश कुमार यांच्या सरकारमधील मंत्री राम सूरत राय यांनी केले. बिहारमधील महसूल व जमीन सुधारणा मंत्री राम सूरत राय यांनी स्वत:च्या मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विभागांमध्येही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचाही उल्लेख केला. त्यांनी आपल्याच पक्षाच्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारं वक्तव्य केले असल्याने पक्ष त्यांच्यावर कोणती कारवाई करणार हा उत्सुकतेचा प्रश्न आहे.
नितीश यांच्या मंत्रीमंडळामध्ये भाजपाच्या कोट्यातून मंत्री झालेल्या राम सूरत राय यांनी स्वत:च्या विभागाचा उल्लेख करताना इथेही चुकीच्या पद्धतीने व्यवहार होतात असं म्हटलं आहे. मुज्जफरपूरमधील एका सत्कार सोहळ्याच्या वेळी राय यांनी हे वक्तव्य केल्याचे एका वृत्तपत्राच्या वृत्तातही नमूद केले आहे.
राम सूरत राय यांच्या या वक्तव्यावरुन आता राजकारण सुरु झालं आहे. राम सूरत राय यांच्या वक्तव्यावर जनता दल युनायटेडने आक्षेप नोंदवल आहे. जदयूचे आमदार खालिद अनवर यांनी राम सूरत राय आता मंत्री झाले आहेत. त्यांना अंदाज नसेल पण नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थारा दिला जात नाही. बिहार हे असं पहिलं राज्य आहे जिथे भ्रष्टाचारप्रकरणी अगदी मोठ्या अधिकाऱ्यांवरही सरकारन ेकारवाई केली आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये नितीश कुमार हे थेट कारवाई करतात, असं अनवर यांनी म्हटलं आहे.सत्ताधारी पक्षातील मंत्र्यानेच असं वक्तव्य केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने चौकशीची मागणी केली आहे. सध्या मंत्री असणाऱ्या नेत्याने आपल्या विभागात भ्रष्टाचार होत असल्याचं म्हटलं असेल तर यापूर्वी मंत्री होऊन गेलेल्यांचीही चौकशी झाली पाहिजे असं विरोधी पक्षांनी म्हटलं आहे.