बाल दिनाचे औचित्य साधून निगडीतील बालकांनी व्यक्त केली असुरक्षिततेची भावना !
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
जगा व जागुद्या संस्थेच्या बाल सदस्यांनी बाल दिनाचे औचित्य साधून एक आशेचा किरण दीप प्रज्वलन ही संकल्पना राबवत मनातील असुरक्षिततेची भावना व्यक्त व्यक्त केली. निगडी येथील टिळक चौकात या बाल मित्रांनी दीप प्रज्वलन आणि घंटा नाद केला.
हातात तेवत असलेली मेणबत्ती म्हणजे आशेचा किरण घेवून ही बाल मंडळी हातात फलक घेवून मूकपणे उभी होती. शहरात वाढलेली गुन्हेगारी, पर्यावरणाचा ह्यास, निगडीमध्ये मध्यंतरी झालेला बलात्कार, यामुळे आम्हाला असुरक्षित वाटत आहे. असा फलक घेवून काही बाल मंडळी मूकपणे उभी होती.
तर काहीं बाल मंडळी चिखली येथे होणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्रासाठी होणाऱ्या झाडाच्या कत्तली थांबाव्यात, यासाठी पर्यायी जगा शोधण्यासाठीचा फलक घेवून मूकपणे उभी होती. महानगर पालिकेची चार प्रभाग पद्धत हानिकारक असल्याने “चार प्रभाग पद्धत बंद करा ‘ हा संदेश संस्थेच्या वतीने देण्यात आला.
ह्यावेळी जगा व जगु द्या संस्थेचे बाल सदस्य आयुता रांगोळे, दिशा राठी, निकिता बाहेती, गणेश तिवारी, ओमकार कोंढाळकर, सिध्दार्थ बाहेती, हृषिकेश कोंढाळकर, भालचंद्र बागल, देवेश वाळके, राहुल नाईक, अभिषेक वाळके आणि इतर बाल मंडळी तसेच जगा व जागु द्या संस्थेचे संस्थापक डॉ. संदीप बाहेती, सदस्य नवनीत राठी, संदीप रांगोळे इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.