फडणवीस सरकारचे काऊंटडाऊन सुरु, उद्या अग्निपरीक्षा !
नवी दिल्ली | देवेंद्र फडणवीस सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांना उद्या म्हणजे 27 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. सुप्रीम कोर्टाने फडणवीसांना 30 तासांची मुदत दिली आहे. ही बहुमत चाचणी खुल्या पद्धतीने होईल म्हणजेच गुप्त होणार नाही. त्याचं लाईव्ह चित्रीकरण करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले.
महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबतचा महानिकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला. सर्वोच्च न्यायालयात आज सलग तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतर, तात्काळ बहुमत चाचणी घेण्याची मागणी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकासआघाडीने सुप्रीम कोर्टात केली होती त्याबाबत रविवार आणि सोमवार अशा दोन्ही दिवस दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला. शिवसेनेतर्फे कपिल सिब्बल, काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे अभिषेक मनू सिंघवी, अजित पवार यांच्यातर्फे मणिंदर सिंग, भाजपतर्फे मुकुल रोहतगी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात आपआपली बाजू मांडली.