कोकणातील चाकरमान्यांसाठी मनसेकडून खास गिफ्ट
कोकणातील चाकरमान्यांना त्यांच्या लाडक्या गणपतीबाप्पासाठी गावी जाता यावे याासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक खास गिफ्ट देण्यात आलं आहे. गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी उत्सुक असलेल्या लाखो चाकरमान्यांची लॉकडाऊनच्या नियमांमुळं कोंडी झाली आहे. राज्य सरकार ही कोंडी फोडण्यासाठी कुठलाही प्रयत्न करत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता कोकणवासीयांच्या मदतीला धावली आहे. गणपतीला जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी येत्या ४ ऑगस्टपासून बसेस सोडण्याची घोषणा मनसेनं केली आहे.
मनसेचे सरचिटणीस व माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. ‘गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारनं कोकणातील गणेशभक्त मोठ्या संभ्रमात आहेत. गावाला गेल्यावर १४ दिवस क्वारंटाइन व्हावे लागणार की ७ दिवस हा घोळ अजून संपलेला नाही. राज्यातील अकार्यक्षम सरकार कुठलाही निर्णय घेण्याच्या तयारीत आणि मन:स्थितीतही नाही,’ असं देशपांडे यांनी म्हटलं आहे.
‘कोकणवासीयांसाठी बस सोडा अशी मागणी मनसेनं केली होती. त्यावर बसेस सोडू असं आश्वासन एसटी महामंडळानं आम्हाला दिलं होतं. पण त्या दृष्टीनं कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. आम्ही त्यांच्याशी वारंवार संपर्क केला. मात्र, त्यांच्याकडून काहीही उत्तर आलेलं नाही. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मनसे म्युनिसिपल कर्मचारी सेना येत्या ४ ऑगस्टपासून कोकणात जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करणार आहे. सर्व चाकरमान्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहन देशपांडे यांनी केलं आहे. येत्या १ ऑगस्टपासून बसेसचं बुकिंग सुरू होईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.