फडणवीस सरकारकडून शिवसेना, राष्ट्रवादी नेत्यांचे फोन ‘टॅप’, भाजप नेत्याने दिली संजय राऊतांना माहिती
मुंबई | महाईन्यूज
‘माझा फोन टॅप केला जात असल्याची माहिती मला भाजपच्या एका माजी ज्येष्ठ मंत्र्याने दिली होती’. असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. फडणवीस सरकारच्या कार्यकाळात तत्कालीन विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप होत आहे. त्याचा धागा पकडून संजय राऊतांनी ‘ट्विटर’वरून हा दावा केला आहे.
‘तुमचा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याने (त्यावेळी) दिल्यानंतर मी त्यांना एवढंच म्हणालो की, भाईसाहेब, माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल, त्यांना ऐकू देत. त्यांचं स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिष्य आहे. कोणतीही गोष्ट लपून छपून करत नाही. ऐका माझं बोलणं’ असं संजय राऊत यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.
महाविकास आघाडी सरकारने भाजप सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. फोन टॅपिंग आणि स्नूपिंग झालेल्या नेत्यांमध्ये खुद्द दिग्विजय सिंग यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांचाही समावेश असल्याचा आरोप होत आहे.
फडणवीस सरकारच्या काळात त्यांच्याकडून तत्कालीन विरोधी पक्ष आणि शिवसेना नेत्यांचे फोन टॅप झाल्याचं दिग्विजय सिंह यांनी सांगितलं. त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान इस्रायल येथून आणल्याचाही आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. आम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत आहोत. फोन टॅपिंग करुन नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान घेण्यासाठी इस्रायलला कोण गेलं होतं, याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.