शरद पवार यांच्या निवास स्थानातील सुरक्षा मोदी सरकारने हटवली
नवी दिल्ली|महाईन्यूज
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा हटविण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांचे तीन आणि सीआरपीएफचे तीन जवानांची सुरक्षा काढण्यात आली आहे. याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता मोदी सरकारने सुरक्षेत कपात केल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा हटवली का, असा प्रश्न विचारला असता अशी कोणतीही माहिती कळविली नसल्याचे सांगण्यात आले.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना (व्हीव्हीआयपी) केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे सुरक्षा व्यवस्था पुरवली जाते. संभाव्य धोक्याचा आढावा घेऊन त्यात बदलही केला जातो. दिल्लीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निवासस्थानी दिल्ली पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांमार्फत सुरक्षा दिली जाते. त्यानुसार शरद पवार यांचं निवासस्थान असलेल्या ‘सहा जनपथ’मध्ये दिल्ली पोलिस आणि सीआरपीएफचे प्रत्येकी तीन जवान दिवसरात्र तैनात होते.
पवारांच्या निवासस्थानाबाहेरील सर्व सुरक्षा व्यवस्था सोमवार 20 जानेवारीपासून हटवण्यात आली. दिल्लीतील 40 अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेतही अचानक कपात केली आहे. सरकारतर्फे या बदलाविषयी कोणतीही अधिकृत माहिती किंवा पूर्वकल्पना संबंधित व्यक्तींना देण्यात आलेली नाही. दिल्लीत सुरु असलेली आंदोलनं, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्थेमुळे मोदी सरकारने सुरक्षा कर्मचाऱ्यांचा उपयोग अन्यत्र केल्याची शक्यता वर्तवली जात आहे, परंतु सुरक्षा हटवण्यापूर्वी कल्पना न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
या नेत्यांचीही सुरक्षा हटविली होती
काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा हटवली होती. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्याही एसपीजी सुरक्षेत बदल करण्यात आला होता. तर द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन, तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांना केंद्र सरकारतर्फे पुरवली जाणारी सुरक्षा व्यवस्थाही हटवण्यात आली आहे.