पुन्हा आवाज काढाल, तर तिकीटच कापतो, उत्साही कार्यकर्त्यांना अजित पवारांचा इशारा
- भोसरीतील गावजत्रा मैदानावर राष्ट्रवादी काॅंग्रेसची जाहीर सभा
- भोसरीत विलास लांडेचा उत्साही कार्यकर्त्याकडून जयघोष
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भाजप-शिवसेना पक्षाचे वाभाडे काढत असताना व्यासपीठासमोरील जनतेतून विलास लांडे यांच्या नावाचा जयघोष सुरु होता. त्यावेळी अजितदादांच्या भाषणात व्यत्यय येवू लागला. याप्रसंगी संतप्त अजित पवार यांनी ‘आता परत आवाज काढाल, तर तिकीटच कापतो, असं म्हणून शिरूरचे इच्छुक उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना अप्रत्यक्ष धमकीच दिली. यामुळे विलास लांडेच्या उत्साही कार्यकर्त्यांचा आवाज थंडच झाला.
शिवसेनेचे उपनेते अमोल कोल्हे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर भोसरीत त्यांच्या उपस्थितीत पहिला मेळावा आज पार पडत आहे. यावेळी व्यासपीठावरून बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, देवदत्त निकम, अभिनेते अमोल कोल्हे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नेते नाना काटे, नगरसेवक जालिंदर शिंदे, वसंत लोंढे, मोहिनी लांडे, विक्रांत लांडे आदी यावेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, युतीसोबत 25 वर्ष काम केले, ती वर्षे सडली असे उध्दव ठाकरे स्वतः म्हणत होते. मंत्र्यांच्या खिशात राजीनामे आहेत, असेही ते म्हणत होते. शेवटी शिवसेनेवर आरोप करणारे भाजप सुध्दा त्यांच्याच हातात हात देऊन युती केली. देशपातळीवर राज्यात पर्याय देण्याचा आपला प्रयत्न आहे. शिरूरची जागा आपल्याला मिळाली आहे. पाठी कोरी असताना मला सुध्दा पिंपरी-चिंचवडकरांनी लोकसभेत पाठविले. त्यावेळेसपासून या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम आपण सर्वांनी केलं. म्हणून बेस्ट सिटी म्हणून आपण शहराचे नाव लौकीक करण्याचे काम केले.
भाजपकडून करोडो रुपयांचा पैसा जाहिरातबाजीवर खर्च केला जातो. इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, राजू गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काहीही केले नाही, असे चित्र नागरिकांच्या मनावर बिंबविण्याचे काम भाजपचे मंत्री करत आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, असा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. भाजपवाल्यांना सत्तेचा माज आला आहे, असंही अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेवर टीका केली.
केंद्रात भाजप, राज्यात भाजप, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता तरी शहराची काय अवस्था आहे. 2 कोटी नोक-या देण्याचे आश्वासन दिले. कोणाला दिल्या नोक-या. गेल्या 25 वर्षात जे घडलं नाही, ते भाजप-शिवसेनेच्या काळात घडले. सर्वांत जास्त बेरोजगारी या चार वर्षाच्या कार्यकाळात निर्माण झाली. करोटो रुपयांचा पैसा जाहिरातबाजीवर खर्च केला जात आहे. इंदिरा गांधी, वाजपेयी, राजू गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काहीही केले नाही, हे नागरिकांच्या मनावर बिंबविण्याचे काम भाजप करत आहे, असे पवार म्हणाले.
पवार पुढे म्हणाले की, मेक इन इंडिया, स्कील डेव्हलप इंडिया याच्या माध्यमातून चाकण, पिंपरी-चिंचवड एमआयडीसीमध्ये किती कंपन्या आल्या. एकही कंपनी आलेली नाही. उद्योगनगरीला गुन्हेगारांचा विळखा पडलेला आहे. गेल्या चार वर्षात कामगारांची वाताहत झाली आहे.
आचार संहिता लागू झाल्यानंतर कोणतीही नोकर भरती होत नसते. केवळ नागरिकांना अमिष दाखविण्याचे काम भाजप सरकार करत आहे. भाजप सरकार गाजर दाखवित आहे. परंतु, गाजरा सुध्दा भाव नाही. उसाला भाव नाही. कांदा, बटाटे, टमाटे याला बाजारात भाव नाही. तीन-तीन वर्ष शेतकरी कर्ज माफी असते काय?, तीन-तीन वेळा निवडून गेलेल्या खासदाराला येथील प्रश्नांची जाण नाही का, वाहतूक कोंडी त्याला दिसत नाही का. राजगुरूनगर मधील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आले असते तर पिंपरी-चिंचवडकरांना खूप महत्व प्राप्त झाले असते. त्याठिकाणी हा प्रकल्प आला नाही. त्याला खासदारच जबाबदार आहे.