‘पुण्यात नाही पाण्यात राहतो सांगायचं’; सभा रद्द झाल्याने शहर व्यवस्थापनावर राज ठाकरे संतापले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी सांताक्रूझ येथील सभेमध्ये अर्धा तास पाऊस पडला तरी पुणे शहर तुंबत असल्याचे सांगत शहर प्रशासनावर चांगलाच संताप व्यक्त केला. पुण्यामध्ये पहिली सभा होणार होती मात्र पावसामुळे ती रद्द झाल्याचे सांगतच राज यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. ‘अर्धा पाऊण तास पाऊस पडला तरी शहराची पूर्ण वाट लागते. पुणेकरांनी या पुढे पुण्यात नाही पाण्यात राहतो असं सांगावं,’ असा टोला राज यांनी आपल्या भाषणामध्ये लगावला.
बुधवारी राज ठाकरे यांची पुण्यातील नातू बाग मैदानामध्ये सभा होणार होती. याच सभेमधून ते मनसेच्या प्रचाराचा श्रीगणेशा करणार होते. मात्र पुण्यात बुधावारी संध्याकाळी वादळी वाऱ्यांसहीत पाऊस झाला. त्यामुळेच राज यांची सभा रद्द करावी लागली. गुरुवारी त्यांनी मुंबईमधील सांताक्रूझमध्ये आपली पहिली सभा घेतली. या सभेच्या सुरुवातीलाच मंचावर आल्यानंतर राज यांनी ‘मला हल्ली भाषणासाठी कमी आणि प्रवासासाठी जास्त वेळ लागतो असं सांगितलं. वाहतुककोंडीमुळे मुंबईसारख्या शहरांमुळे सगळ्या सभांना वेळेत पोहचणं अवघड होऊन जातं’ असं म्हणालं.
पुढे बोलताना त्यांनी पुण्यातील सभा रद्द होण्याच्या मुद्द्यावरुन शहर व्यवस्थापनाच्या मुद्द्याला हात घातला. ‘काल माझी पुण्यात सभा होती पण इतका पाऊस पडला तिकडे. अर्धा पाऊण तासच पडला पण पुर्ण वाट लावून गेला. सर्व शहर ट्रॅफिकने कोलडमलं. सभा होती तिथे पाणी साचलं. अनेक ठीकाणी झाडं पडली. एक बस चालक बसवर झाड कोसळल्याने मरण पावला,’ असं राज यांनी सांगितलं. आपण सभेसंदर्भात काय करायचं याबद्दल विचार करत होतो असं सांगताना त्यांनी ‘मी निघायच्या तयारीत होतो संध्याकाळी सहा ते रात्री साडे दहा पर्यंत वीजच नव्हती. अंधारामध्ये बसलो होतो सगळे. मी कोणाशी बोलतोय आणि कोण माझ्याशी बोलतयं तेच कळत नव्हतं. फक्त आवाज ऐकू येत होते.’ असं सांगितलं.