पुण्यात दोन दिवसांआड पाणी देण्याची वेळ येणार ?
पुणे – शहराची वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेता शहराला दररोज किमान १३५० एमएलडी पाण्याची गरज आहे; परंतु महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आता केवळ दररोज ६३५ एमएलडी पाणी देण्याचा निर्णय दिला आहे. हा निर्णय शहरावर अन्याय करणार असून, प्राधिकरणाच्या निर्णयाच्या विरोधात शासनाकडे अपील दाखल करणार आहोत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी यांनी दिली. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याचा निर्णय आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात होणार आहे.
महापालिकेच्या शपथपत्राच्या आधारे ६३५ एमएलडीचा निर्णय शहराची लोकसंख्या ३९ लाख १८ हजार असून, तीनही कॅन्टोन्मेंट
बोर्ड आणि शहरालगतची गावे अशी मिळून १ लाख ५८ हजार लोकसंख्या अशी एकूण ४० लाख ७६ हजार लोकसंख्या असलेल्याचे शपथपत्र महापालिकेच्या वतीने जलसंपत्ती प्राधिकरणाकडे सादर केले होते. या शपथपत्राच्या आधारे प्राधिकरणाने प्रतिदिन प्रतिव्यक्ती १३५ लिटर पाणी देण्याचे निश्चित करून पुणे शहरासाठी वर्षाला ८.१९ टीएमसी पाणीपुरवठा करण्यात येईल, असा निर्णय गुरुवारी (दि.१३) रोजी दिला. यामुळे पुणे शहराला दररोज केवळ ६३५ एमएलडीच पाणी मिळणार आहे.
जलसंपदा विभागाने प्राधिकरणाचा आदेश पाळल्यास पुण्यात पाण्याची मोठी टंचाई निर्माण होणार आहे. सध्या महापालिका १५०० ते १६०० एमएलडी पाणी उचलत आहे. त्यामुळे पुण्याला पुरेसा पाणीपुरवठा होत आहे. ६३५ एमएलडीच पाणी मिळाले, तर आताच्या पुण्याच्या गरजेप्रमाणे तीन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. महापालिकेला शहराच्या अनेक भागांत पाणी पोहोचविण्यासाठी कसरत करावी लागणार.