‘पीसीएमटी’चे ‘पीएमपीएमएल’मध्ये विलीनीकरण करून शहराचं वाटोळं झालंय- महापौरांचा त्रागा
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. (पीएमपीएमएल) व्यवस्थापनाला पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रतीवर्षी 40 टक्के परतावा दिला जातो. त्या बदल्यात शहरातील नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. पीसीएमटीचे पीएमपीएमएलमध्ये विलीनीकरण करून शहराचं वाटोळं झालं आहे. यापुढे सुविधा देण्यात शहराला सवतीसारखी वागणूक दिल्यास पुढील वर्षाच्या 40 टक्के फंड दिला जाणार नाही, असा त्रागा महापौर राहूल जाधव यांनी पीएमपीएमएलच्या ढिसाळ व्यवस्थापनावर व्यक्त केला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या वतीने पीएमपीएमएलला अनुक्रमे 60-40 टक्क्यानुसार आर्थिक फंड दिला जातो. त्याबदल्यात नागरिकांना सार्वजनिक प्रवासी सुविधा वेळेवर उपलब्ध करून देण्याचे काम पीएमपीएमएल व्यवस्थापनाचे असते. मात्र, 40 टक्के परतावा देऊनही पिंपरी-चिंचवड शहराला सवतीसारखी वागणूक दिली जाते. प्रत्येक वेळी बैठकीला तत्कालीन कार्यकारी संचालक तुकाराम मुंडे यांनी हे केले, त्यांनी ते केले, म्हणून आमच्यावर अशी वेळ आल्याचे पीएमपीएमएलचे अधिकारी सांगतात. परंतु, मुंडे यांच्यानंतर यांनी चांगल्या सुविधा शहरातील नागरिकांना दिल्या नाहीत. सध्याच्या व्यवस्थापकीय अध्यक्षा तथा संचलिका नयना गुंडे प्रत्येक वेळी तोंड पाडून बसतात. त्यांना विचारले असता त्या उत्तरे देत नाहीत. त्यामुळे शहरातल्या नागरिकांवर होणारा अन्याय कसा दूर करायचा, असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला.
पीएमपीएमएलचे कामकाज पाहणारे पालिकेतील अधिकारी माने म्हणाले की, सहा वर्षात 500 बसेस खरेदी करण्याचे ठरले आहे. त्या बसेस अद्याप खरेदी झालेल्या नाहीत. आजअखेर केवळ 200 नवीन बसेस खरेदी केल्या आहेत. बसेसची कमतरता असल्यामुळे काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता हा बीआरटी मार्ग सुरू होण्यापासून रखडलेला आहे. जोपर्यंत बस खरेदी होत नाहीत. तोपर्यंत हा मार्ग सुरू होणे शक्य नाही.