पालघर साधू हत्याकांडाचा तपास सीबीआय, एनआयएकडे द्या-साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर
नवी दिल्ली – महाराष्ट्रातील पालघरमध्ये साधूंच्या झालेल्या हत्याकांडाचा तपास सीबीआय किंवा एनआयएसारख्या संस्थांकडे देण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी लोकसभेत केली. एप्रिल महिन्यात २ साधू आणि त्यांच्या वाहनचालकाला पालघरमध्ये जमावाने बेदम मारहाण करून ठार मारले होते. हा मुद्दा प्रज्ञासिंग ठाकूर यांनी लोकसभेत उपस्थित करून ही मागणी केली.
लोकसभेतील शून्य तासातील चर्चेच्यावेळी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले असताना पालघरमध्ये साधूंना मारण्यासाठी जमाव कसा काय गोळा झाला. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. ही घटना ज्या ठिकाणी घडली, त्या भागात माकपचे वर्चस्व आहे. यापूर्वीही तेथे अशा घटना घडल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेला महाराष्ट्र पोलिसांनी विरोध करून या प्रकरणात सीआयडी तपासानंतर न्यायालयात २ आरोपपत्रे दाखल केली असल्याचे सांगितले होते. त्यामुळे हा तपास सीबीआयकडे देण्याची गरज नसल्याचे पोलिसांनी म्हटले होते. परंतु हा तपास केंद्रीय एजन्सीकडे दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.