पार्थ पवारांच्या पराभवाची जबाबदारी माझी-अजित पवार
लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. शिवसेनेचे श्रीरंग बारणे विरूद्ध पार्थ पवार असा सामना या ठिकाणी होता. यामध्ये पार्थ पवारांना हरवत बाजी मारली ती श्रीरंग बारणे यांनी. त्यानंतर आता पार्थ पवारांच्या पराभवाची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. मावळ मतदारसंघातल्या जनतेने दिलेला कौल आपण स्वीकारला आहे असंही ते म्हटले आहेत. तसंच आता सगळ्या कार्यकर्त्यांनी जोमाने विधानसभा निवडणुकांची तयारी करावी असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
राज्यात दुष्काळानं आ वासला आहे, या समस्येला तोंड देणे हे आपल्यापुढचे सर्वात मोठे आव्हान आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या दुष्काळाच्या समस्येवर आम्ही बैठक घेऊन चर्चा केली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांना दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा तोड्या थोडक्या नाही तर २ लाख १५ हजार मतांनी पराभव केला.
पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने शरद पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. एकाच घरातले कितीजण उभे रहाणार? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी माघार घेतली. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. पवार घराण्यातले निवडणूक हरलेले पवार म्हणून पार्थ यांच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. पार्थ पवार यांना उमेदवारी दिली गेल्याने या ठिकाणच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं. अजित पवार यांनी स्वतः या प्रचारात लक्ष घातलं होतं. मात्र तरीही पार्थ पवार निवडून येऊ शकले नाहीत. त्याचमुळे त्यांच्या पराभवाची पूर्ण जबाबदारी आपली आहे असं म्हणत अजित पवार यांनी ती जबाबदारी स्वीकारली आहे. एबीपी माझाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जेव्हा पहिल्यांदा भाषण केलं तेव्हा ते बरेच अडखळले. त्यावेळी त्यांना नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केलं. असं असलं तरीही आपण बोलण्यापेक्षा कामावर भर देऊ असं म्हणत त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत विविध आश्वासनं दिली खरी मात्र मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिला नाही. त्यामुळे पार्थ पवार यांच्या पराभवाची जबाबदारी माझीच आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.