‘भारतात पैशाची नाही तर प्रामाणिक नेत्यांची कमतरता’; नितीन गडकरींचं विधान
![Nitin Gadkari said that India lacks not money but honest leaders](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Nitin-Gadkari-1-780x470.jpg)
Nitin Gadkari | केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या रोखठोक मतांसाठी ओळखले जातात. नुकतेच त्यांनी राजकारण्यांच्या हेतूबाबत एक विधान केले आहे. भारतात पैशांची कमतरता नाही. पण देशासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांची कमतरता आहे, असे विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते चंदीगड येथे बोलताना केले.
नितीन गडकरी म्हणाले की, मी १९९५ साली युतीची सत्ता असताना मी मंत्रीपद भुषविले. आज तुम्ही मुंबईत गेल्यास तुम्हाला वरळी-वांद्रे सी लिंक दिसेल. तो तयार करण्याचे भाग्य मला मिळाले. मुंबईत ५५ पूल तयार केले. मुंबई-पुणे महामार्ग तयार करण्याची जबाबदारी मी पार पाडली. तेव्हा माझ्याकडे फक्त पाच कोटी होते. पैशांची कमतरता होती. त्यावेळी रिलायन्सचे ३६०० कोटींचे टेंडर मी रद्द केले. आज त्याची किमंत ४० हजार कोटींच्या घरात आहे. मी ते टेंडर रद्द केल्यानंतर खूप वाद झाला. सर्वात कमी किंमत त्यांनी दिली होती, अशी टीका माझ्यावर झाली. पण मला सांगायला आनंद होतो की, आम्ही कॅपिटल मार्केटमध्ये गेलो. एमएसआरडीसी सारखी संस्था निर्माण केली. आम्ही बाजारातून पैसे उभे केले. आम्ही ६५० कोटी जमवायला गेलो होतो, पण आम्हाला ११५० कोटी मिळाले. या एका प्रसंगाने मला शिकवले की, देशात पैशांची कमतरता नाही.
हेही वाचा – सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर
आम्ही तीन-चार महिन्यापूर्वी एनएचएआय इन्फ्रास्ट्रक्चर इनव्हेस्टमेंट ट्रस्ट कंपनीला बीएसइ वर सूचीबद्ध केले. केवळ सात तासांत आमचा बाँड प्रचंड विकला गेला. आमच्या सहकाऱ्यांकडून मला तातडीचे बोलावणे आले. मी गोव्याहून मुंबईत गेलो आणि बीएसई इमारतीमधील बेल वाजवून बाँड बंद केला. सात पटीने अधिक त्याची विक्री झाली होती. पैशांचा पाऊस पडला. मी ५० लाख कोटींचे काम केले आहे. तरीही आणखी २० ते २५ लाख कोटींचे काम मी करू शकलो असतो, पण ते झाले नाही, याची सल माझ्या मनात आहे, असंही नितीन गडकरी म्हणाले.