पायी घरी निघालेल्या 7 जणांना टेम्पोने उडवलं
पालघर | कोरोना संसर्गाच्या नियंत्रणासाठी देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाली. या दरम्यान अनेक मजूर आपल्या घराकडे निघाले आहेत. वाहनांना बंदी असल्याने हे मजूर पाईच प्रवास करत आहेत. विरारमध्ये या मजूरांची हीच घरी जाण्याची ओढ जीवावर बेतली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर पायी निघालेल्या 7 जणांना एका टेम्पोने उडवलं. या भीषण अपघात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
देशात लॉकडाऊन असल्याने सर्वच प्रवासी वाहने बंद आहेत. त्यामुळे घराकडे निघालेल्या नागरिकांनी नाईलाजाने पायीच प्रवास सुरु केला आहे. अशाच पायी घरी जाणाऱ्या 7 प्रवाशांचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत भीषण अपघात झाला. यात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व प्रवासी देशात संचारबंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात होते. गुजरातकडील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आलं. परत वसईच्या दिशेने येत असताना महामार्गावरील विरार हद्दीत भारोल परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या आयसार टेम्पोने यांना जोरदार धडक दिली. या अपघातातील 2 जणांची ओळख पटली असून 5 जणांची ओळख अद्याप पटलेली नाही. ओळख पेटलेल्यांपैकी एकाचं नाव कल्पेश जोशी (32) तर दुसऱ्याचं नाव मयांक भट (34) असं आहे.