पाच वर्षे मुख्यमंत्री शिवसेनेचाच, नवाब मलिक यांनी चर्चांवर टाकला पडदा
मुंबई | महाईन्यूज
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने शिवसेना सरकार स्थापन करणार हे निश्चित आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल हे सुद्धा ठरलं आहे. मात्र, शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद किती वर्षांसाठी असेल याबाबत जे तर्कवितर्क लढवले जात होते, त्यावरही पडदा पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी “5 वर्षांसाठी मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल, आम्ही पाठींबा देऊ” असं स्पष्ट केलं. ते एका मराठी वृत्तवाहिनीला बोलत होते.
“मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल, जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर उत्तम, ते सरकारचा चेहरा ठरु शकतात. 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री सेनेचा असेल, आम्ही पाठींबा देऊ”, असं नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक म्हणाले, “सत्तासंघर्ष संपला आहे. आज 4 वाजता बैठक आहे. सगळं ठरलं की दोन दिवसांत राज्यपालांकडे जाऊ आणि सरकार स्थापनेचा दावा करु. ते लक्ष देतील ही अपेक्षा आहे.”
किमान समान कार्यक्रमाचा अजेंडा आज फायनल होईल. दोन दिवसात गुड न्यूज मिळेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. राष्ट्रवादीला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद हवं आहे का, असा प्रश्न विचारला असता, त्या केवळ चर्चाच आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नका, असं नवाब मलिक म्हणाले.
महारष्ट्रात आघाडी करताना नवं नाव ठरवू. युती केल्यानंतर पक्षाचं नाव ठेवण्यात येत नाही. हे थोतांड मीडियानं पसरवलं आहे, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला. सरकार धर्मनिरपेक्ष असेल, महाराष्ट्राला विकास हवा आहे. पवारांनी दिल्लीच्या चाणक्यला दाखवून दिलं की नाद करायचा नाही, असं म्हणत नवाब मलिकांनी अमित शहांवर निशाणा साधला.