गोव्याने आपला चौकीदार गमावला: शिवसेना
मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातूनही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचा चेहरा बदलला. गोवा हे पर्यटकांसाठी अमली पदार्थांचे स्वर्गद्वार होते. पर्रिकरांनी ही ओळख पुसून टाकली. तिरंग्यात लपेटलेल्या त्यांच्या पार्थिवास भारतीय सैन्याने खांदा दिला. अखेरची मानवंदना दिली, तेव्हा गोव्याने आपला चौकीदार गमावला, अशा शब्दात शिवसेनेने मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मनोहर पर्रिकर यांचे रविवारी कर्करोगाने निधन झाले. सोमवारी शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. देशाच्या राजकारणातून ‘साध्या’, ‘सरळ’, पण तितक्याच कर्तव्यकठोर माणसाने कायमचा निरोप घेतला आहे. मनोहर पर्रिकर यांचे जाणे म्हणजे राजकारणातील सत्य-सचोटीचा दिवा विझण्यासारखे आहे. सध्या ‘चौकीदार’ या शब्दावर जोर दिला जात आहे, पण गोव्याच्या चौकीदाराची जबाबदारी पर्रिकरांनी चोख बजावली होती, असे शिवसेनेने म्हटले होते.
पर्रिकरांचे कमालीचे साधेपण व रक्ताच्या थेंबा थेंबातली सचोटी लोकांनी अनुभवली. त्यांनी हे सर्व न बोलता केले. साधेपणाचा बडेजाव मिरवला नाही. पर्रिकर हे तीन वेळा गोव्याचे मुख्यमंत्री झाले. लढवय्या नेता म्हणून ते गोव्यातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले. पुढे २०१४ साली मोदी पंतप्रधान झाले व आपल्या मंत्रिमंडळात पर्रिकर यांना संरक्षणमंत्री म्हणून आणले. संरक्षणमंत्री म्हणून त्यांचा प्रामाणिकपणा व साधेपणा तसाच होता. उरी हल्ल्यानंतर पर्रिकरांमधील कणखर राष्ट्रभक्त उसळून उठला व पाकव्याप्त कश्मीरवर सर्जिकल स्ट्राइक करून भारतीय सैन्याची ताकद व शौर्य जगाला दाखवून दिले, असे शिवसेनेने म्हटले आहे.