breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘पाच दिवसांचा आठवडा करा’…राज्य सरकारी कर्मचारी ८ जानेवारीला संपावर…

मुंबई | महाईन्यूज |

पाच दिवसांचा आठवडा करावा या आणि इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी ८ जानेवारी रोजी म्हणजे उद्याच संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या या संपाला राज्य राजपत्रित महासंघाने पाठिंबा दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सरकारी कर्मचारी संघटनेने त्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या मागण्या मांडल्या होत्या. पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करावी आणि नवी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करावी आदी मागण्या मंजूर करण्याची मागणी कर्मचारी संघटनांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

मुख्यमंत्र्यांनीही पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या मागणीचा विचार करण्याचं आश्वासन या संघटनांना दिलं होतं. मात्र सरकार स्थिर होऊनही पाच दिवसांच्या आठवड्यावर अद्याप काहीच निर्णय न झाल्याने अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या ८ जानेवारीपासून संपावर जाऊ, असं कर्मचारी संघटनेने म्हटलं आहे. या कर्मचारी संघटनेला राज्य राजपत्रित महासंघाचा पाठिंबा मिळाल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, ८ जानेवारी रोजी शेतकरी संघटनांनी भारत बंदची आधीच हाक दिली आहे. त्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनीही संपाचे हत्यार उपसल्याने वर्षाच्या पहिल्याच महिन्यापासून राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना सरसकट देशव्यापी कर्जमुक्ती द्या, शेतीमालाला दीडपट हमीभावासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदा करा, शेतकऱ्यांना पीकविम्याचे सर्वंकष संरक्षण द्या, सिंचन, दुष्काळ, पेन्शन, आरोग्य, पर्यावरण यासह सर्व मुद्द्यांचा विचार करून शेती क्षेत्राच्या विकासासाठी सर्वंकष विकास व्हावा, यासाठी देशव्यापी धोरण स्वीकारा आदी मागण्यांसाठी ८ जानेवारी रोजी शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button