मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ, विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन सुरुच
औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्यावतीने सुरु असलेले ‘लेखणी बंद’ आंदोलन अद्यापही सुरु आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह अधिकाऱ्यांसोबत बैठक होऊनही सोमवारी (28 सप्टेंबर) तोडगा न निघाल्याने संप सुरुच राहणार आहे.
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून (24 सप्टेंबर) लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. दुसऱ्या दिवशी आंदोलन अधिक तीव्र करुन परीक्षा विभागाचे काम पूर्णत: ठप्प झाले. मागण्या मान्य न झाल्यास 1 ऑक्टोबरपासून ‘काम बंद’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विद्यापीठ कर्मचारी कृती समितीचे राज्य समन्वयक डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिला आहे.
केंद्र आणि राज्यशासनाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करुन दोन वर्षांचा कालावधी लोटला. राज्य शासनाने उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्राध्यापक प्रवर्गासह सातवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या. तथापी राज्यातील 14 विद्यापीठांचे कर्मचारी, अधिकारी अजूनही या आयोगाच्या लाभापासून वंचित आहेत.
या संदर्भात राज्यशासन, मंत्री यांच्यासोबत वारंवार बैठका पार पडल्या. मात्र सातव्या वेतन आयोगासह कर्मचाऱ्यांची कालबद्ध पदोन्नती अनेक विषय प्रलंबित आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालये कर्मचारी संयुक्त कृती समिती स्थापना करण्यात आली आहे. या कृती समितीची गेल्या आठवड्यात ऑनलाईन बैठक होऊन 20 ते 30 सप्टेंबर दरम्यान लेखणी बंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. तर 1 ऑक्टोबरपासून सर्व कर्मचारी संपूर्ण काम बंद करुन संपात सहभागी होणार आहेत.
राज्य शासन केवळ तोंडी आश्वासन देऊन कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भावना तीव्र बनलेल्या आहेत. या राज्यव्यापी आंदोलनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सुमारे 450 अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील हिरवळीवर फिजिंकल डिस्टसिंन्ग ठेऊन कर्मचारी सहभागी झाले.