breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

पराभवानंतर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; हरलोय पण संपलो नाही

मुंबई: सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत लाखांहून अधिक मतांनी दणदणीत पराभव झालेले उदयनराजे भोसले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ‘निवडणूक हरलो आहे, पण संपलो नाही,’ असं काव्यात्मक ट्विट त्यांनी केलं आहे. उदयन यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

ट्विटरच्या माध्यमातून उदयन यांनी पराभवाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ‘हरलो आहे पण थांबलो नाही, जिंकलो नाही पण संपलोही नाही’ असं त्यांनी म्हटलं आहे. पोटनिवडणुकीत मला मतदान करणाऱ्या जिल्ह्यातील लाखो मतदारांचे व दिवसरात्र एक करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. आपल्या सेवेशी सदैव तत्पर,’ असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

उदयन हे मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला लागलेली गळती पाहून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. अवघ्या तीन महिन्यांत खासदारकीचा राजीनामा देऊन ते भाजपच्या तंबूत डेरेदाखल झाले होते. त्यामुळं तिथं पोटनिवडणूक जाहीर झाली. विधानसभेच्या निवडणुकीसोबतच ही निवडणूक झाली. राष्ट्रवादीकडून माजी खासदार, शरद पवारांचे विश्वासू व उच्च विद्याविभूषित श्रीनिवास पाटील हे रिंगणात होते.

उदयनराजेंसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साताऱ्यात सभा घेतली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या साताऱ्यातील मतदारांनी उदयन यांना साफ झिडकारले. पवारांचं पावसातील भाषण आणि सातारकरांची माफी मागून चूक सुधारण्याची केलेली विनंती मतदारांनी मान्य केली. ‘कॉलर’ऐवजी स्कॉलरला पसंती दिली. असं असलं तरी आजच्या ट्विटमधून उदयनराजेंनी पुढंही राजकारणात सक्रिय राहण्याचे संकेत दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button