मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने देशातील सर्वोत्तम वकील दिले – शरद पवार
कोल्हापूर – मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात वातावरण तापलेले आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. ठाकरे सरकारला अंधारात ठेवून राज्य लोकसेवा आयोगाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या याचिकेने मराठा समाजात असंतोष निर्माण झालाय. सरकारला नक्की मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आहे का?, असा प्रश्न या निमित्ताने विरोधक विचारु लागले आहेत. यावरती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सविस्तर उत्तर दिलं आहे. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारने देशातील सर्वोत्तम वकील दिले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं पवार म्हणाले आहेत.
वाचा :-धनंजय मुंडेंबाबत आम्ही घेतलेला निर्णय योग्य होता, रेणू शर्मा प्रकरणावर पवारांची प्रतिक्रिया
“दक्षिणेतील राज्यात ६० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिलेलं असताना सुप्रीम कोर्टाने तिथे त्यांना स्थगिती दिलेली नाही. पण आपल्या महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. आपलं राज्य सरकार उत्तम वकिलांच्या साथीने केस पूर्ण करेल”, असा विश्वास पवारांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी ५ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष याकडे लागले आहे.