परदेशातून आलेले ब्राह्मण आम्हाला प्रमाणपत्राबाबत अक्कल शिकवतात! – ऊर्जामंत्री नितीन राऊत
नागपूर | महाईन्यूज
राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सीएए, एनआरसी आणि एनपीआरच्या मुद्यांवरून ब्राह्मण समाजाला लक्ष्य केले. ब्राह्मण परदेशातून भारतात आले आणि ते आम्हाला प्रमाणपत्र आणा म्हणून अक्कल शिकवत आहेत, असे विधान त्यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात केल्याने नवीन वाद निर्माण झालेला आहे. उत्तर नागपूरच्या इंदोरा मैदानात ८ मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून डॉ. राऊत यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
फुले, शाहू, आंबेडकर विचारसंवर्धन समितीने हा सत्कार आयोजित केला होता. या वेळी ‘सीएए’,‘एनआरसी’ आणि ‘एनपीआर’च्या मुद्यांवर बोलताना राऊत यांनी उपरोल्लेखीत विधान केले. ते म्हणाले, काँग्रेसने ‘सीएए’,‘एनआरसी’ आणि ‘एनपीआर’ यास विरोध केला आहे. २०१० मध्ये काँग्रेस सरकारने जो एनपीआर आणला त्यावेळी ज्या अटी व शर्ती होत्या त्याच राहतील तर आम्ही एनपीआर लागू करू देऊ. अन्यथा ते लागू होऊ देणार नाही. माझ्या आजोबांचे ५० वर्षांपूर्वीचे प्रमाणपत्र मागवले तर मी देऊ शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मी दलित असताना सुद्धा शिक्षणाची संधी मिळाली. त्यामुळे मी आजोबांचे प्रमाणपत्र आणू शकेन. पण, भटके-विमुक्त लोक प्रमाणपत्र कुठून आणतील? जे स्वत: परदेशातून येथे आले. ते ब्राम्हण आम्हाला अक्कल शिकवतील काय? हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही.