‘नोटाबंदीचा वाढदिवस करावे की वर्षश्राद्ध घालावे’
पुणे – दोन वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. मंत्रिमंडळाला आणि रिझर्व्ह बँकेला विश्वासात न घेता पंतप्रधानांनी घेतलेला नोटाबंदीचा निर्णय अविचारी होता. त्याच्या झळा देशातील जनता दोन वर्षापासून सोसत आहे. त्यामुळे या निर्णयाचा वाढदिवस साजरा करावा की वर्षश्राद्ध घालावे, असा प्रश्न पडला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
नोटाबंदीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेस भवन येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, अॅड. अभय छाजेड, महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मंत्रिमंडळातील सहकार्यांचे मोबाईल काढून घेऊन त्यांना एका खोलीत कोंडून ठेवले अणि दुसरीकडे टेलिव्हिजनवर नोटाबंदीची घोषणा केली. खरे तर हा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी मंत्रिमंडळ, रिझर्व्ह बँक, आर्थिक सल्लागार समिती यांच्याशी सल्लामसलत करणे गरजेचे होते. देशातील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात उलथापालथ करणारा हा निर्णय त्यांनी कोणालाही कसलीही कल्पना न देता अविचारी पद्धतीने घेतला. जीएसटी आणि नोटाबंदीने देशातील सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.