‘नागरिकत्व सुधारणा विधेयका’बाबत राज्यसभेत वेगळा निर्णय : संजय राऊत
नवी दिल्ली | आम्हाला कुणीही राष्ट्रभक्ती शिकवू नये, जे मानवतेच्या हिताचं आहे, तोच आमचा निर्णय असेल, असं शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी ठणकावून सांगितलं. लोकसभेत ‘नागरिकत्व सुधारणा विधेयका’ला पाठिंबा देणारी शिवसेना राज्यसभेत वेगळा निर्णय घेऊ शकते, असे संकेत राऊतांनी दिले.
नागरिकता सुधारणा विधेयकाबाबत आम्ही सदनात (राज्यसभा) आमचा मुद्दा मांडू, सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळालं, तर ठीक, अन्यथा आमचा निर्णय वेगळा असेल. लोकसभेतील संख्याबळ वेगळं होतं, राज्यसभेत वेगळी स्थिती आहे. तेव्हाचा निर्णय तेव्हा घेऊ, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. आम्हाला कुणीही राष्ट्रभक्तीबाबत मार्गदर्शन करु नये. जितका त्याग तुम्ही केला, त्यापेक्षा जास्त आम्ही केला. दर वेळी पाकिस्तानची भाषा, बांगलादेशची भाषा.. या देशाचीही एक भाषा आहे. नेपाळमध्ये हिंदूंची अवस्था बिकट आहे. श्रीलंकेतील हिंदूंना का वगळलं? असे सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केले.