नागरिकत्व सुधारणा विधेयक हे भाजपने लोकशाहीवर घातलेला घाला – सचिन साठे
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएबी) म्हणजे देशाच्या सार्वभौमत्व आणि लोकशाहीवर घातलेला घाला आहे, असे मत काॅंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केले.
लोकसभेत मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाला कॉंग्रेसने देशभर विरोध केला आहे. आज बुधवारी (दि.11) चिंचवडच्या चापेकर चाैकात शहर कॉंग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, ज्येष्ठ नेत्या शामला सोनवणे, मयूर जैसवाल, मकरध्वज यादव, शहाबुद्दीन शेख, विशाल कसबे, बाबा बनसोडे, परशुराम गुंजाळ, बाळासाहेब साळुंके, सतीश भोसले, चंद्रशेखर जाधव, संदेश बोर्डे, वसिम शेख, हिरामण खवळे, विष्णू खरे, सॅम्यूअल काळे, सचिन गवारे, मोहन अडसूळ, तुषार पाटील, अनिकेत सोनवणे, अनिकेत अरकडे, रोहित शेळके, दीपक जाधव, वैभव शिरोळे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.
साठे म्हणाले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या घटनेत भारतीय नागरिकत्वाबाबत सर्व जाती धर्माच्या, पंथाच्या नागरिकांना समान हक्क दिले आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाचा या राज्यघटनेत बदल करण्याचा कुटील डाव आहे. यामुळे धर्मा-धर्मात तेढ निर्माण करून आपले नाकर्तेपण झाकण्याचा मोदी सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे.
देशातील बेरोजगारी, महागाई, महिलांवरील अत्याचारात वाढ, दृष्काळ, शेतकरी आत्महत्या, जीडीपीचा घटलेला दर या समस्या सोडविण्याऐवजी देशवासीयांची दिशाभूल करण्याचा हा डाव आहे. भाजप सरकारने लोकसभेमध्ये पाशवी बहुमताच्या जोरावर विरोध डावलून ‘सीएबी’ पास केले आहे. परंतू कॉंग्रेसचे कार्यकर्ते देशभर ‘सीएबी’च्या विरोधात आंदोलन करून जनजागृती करणार आहेत आणि भाजपचा हा डाव उलथवून टाकतील असा विश्वास साठे यांनी व्यक्त केला.