नागरिकत्व नोंदणी कायदा हा केवळ मुस्लिमांचा प्रश्न नाही -ओवेसी
हैदराबाद | महाईन्यूज
नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधातील लढाई ही केवळ मुस्लिमांचा प्रश्न नाही तर सर्व भारतीयांसाठी हा कायदा चिंताजनक आहे, या कायद्याविरोधात ठोस लढा द्यावा लागेल, असे एआयएमआयएमचे अध्यक्ष असादुद्दीन ओवेसी यांनी म्हटलेले आहे. हैदराबाद येथे शनिवारी रात्री उशिरा खासदार ओवेसी यांनी सांगितले की, ‘जर मी भारतीय असेन तर ते सिद्ध करण्यासाठी रांगेत का उभे रहावे, मी या भूमीत जन्माला आलो असेन तर अर्थात भारताचा नागरिक आहे ते वेगळे सिद्ध करण्याची गरज नाही. नवीन कायद्यामुळे भारतातील १२५ कोटी नागरिकांना रांगेत पुन्हा उभे रहावे लागणार आहे. हा केवळ मुस्लिमांचाच प्रश्न नाहीये, याचा सर्व भारतीयांना फटका बसणार आहे. मोदी भक्तांनाही रांगेत उभे रहावे लागेल व कागदपत्रे सादर करावी लागतील.’
युनायटेड मुस्लिम अॅक्शन कमिटीच्या बैठकीत त्यांनी सांगितले की, ‘भारतीय मुस्लिमांनी फाळणीच्या वेळी जिनांच्या दोन देश सिद्धांताला नाकारून भारतात राहणे पसंत केले आहे. भाजपने अनेक इस्लामी देशांत काय चालते त्याचे दाखले दिले असले तरी त्याच्याशी काही देणेघेणे नाही. आम्ही भारतातील परिस्थितीवर चर्चा करीत आहोत. माझे प्रेम भारतावर आहे, मी जन्माने व पर्यायाने भारतीय आहे, तुम्हाला गोळ्या चालवायच्या असतील तर चालवा, पण माझे देशावरचे प्रेम संपणार नाही.’