नरेंद्र मोदी स्वत: पीडित असल्याचे भासवतात
‘यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: पीडित असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील जनता पीडित झाली आहे, असा हल्ला ‘यूपीए’च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी येथे चढविला.
सरदार पटेल राष्ट्रीय स्मारक येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली त्या वेळी सोनिया गांधी यांनी मोदी यांच्यावर हल्ला चढविला. राष्ट्रीय हिताच्या मुद्दय़ावर मोदी सरकार राजकारण करीत असल्याचा आरोपही सोनिया यांनी या वेळी केला. यापूर्वीच्या यूपीए सरकारने केलेली कामगिरी आणि देशाला नवा दृष्टिकोन देऊन पुढे वाटचाल करण्यावर भर देण्याचे आवाहनही सोनिया गांधी यांनी केले.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही मोदी सरकारवर हल्ला चढविला. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था कोसळली आहे, देशातील जनतेला यूपीए सरकारच्या काळातील यशस्वी योजनांबाबत माहिती देणे गरजेचे आहे, सध्याचे भाजपचे सरकार खोटा प्रचार करीत आहे, असेही डॉ. मनमोहन सिंग म्हणाले.
तत्पूर्वी, पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली व बैठकीला सुरुवात करण्यात आली. त्याचप्रमाणे साबरमती आश्रमात म. गांधी यांनाही काँग्रेस नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली.