नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत बोट उलटली, ६ भाविकांचा मृत्यू
नंदुरबारमधील नर्मदा नदीत भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटली असून या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मकर संक्रांतीनिमित्त काही भाविक पुजा करण्यासाठी नदीत गेले होते. यादरम्यान, ही दुर्घटना घडल्याचे समजते. तर २५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
धाडगाव येथील भुसा पॉइंटजवळ भाविकांना घेऊन जाणारी बोट मंगळवारी दुपारी उलटली. सर्व भाविक हे तेलखेडी गावातील असल्याचे समजते. घटनास्थळी तातडीने बचावकार्य देखील सुरु करण्यात आले. या दुर्घटनेत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून २५ जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये दोन महिला, दोन मुले, एक पुरुष व एका बालकाचा समावेश आहे. बोटमध्ये एकूण ४२ भाविक होते. बोटीत मर्यादेपेक्षा जास्त भाविकांना घेतल्याने ही दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दुर्गम भागात दुर्घटना
सरदार सरोवरच्या बॅक वॉटरमध्ये नर्मदा नदीत भूसा पॉइंट आहे. हा दुर्गम भाग असल्याने मदतकार्यात अडथळे येत असल्याचे समजते. दरवर्षी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर स्थानिक पूजेसाठी नर्मदा नदीत जातात. यंदाही अनेक भाविक बोटीतून पूजेसाठी जात होते आणि त्याच वेळी काळाने त्यांच्यावर घाला घातला.