कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी पंढरपूरमध्ये १७ जून पासून तीन दिवसांसाठी कडक संचारबंदी
कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सामना करण्यासाठी पंढरपूर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने आजपासून म्हणजे १७ जून पासून तीन दिवसांसाठी कडक संचारबंदी घोषित केलीआहे…यादरम्यान घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचंही सरपंच अख्तर शेख यांनी सांगितलं आहे.
मागील आठ दिवसांमध्ये गावात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असल्याने रुग्णाची संख्या वाढत आहे. यावर उपाय म्हणून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू घोषित करण्याचा निर्णय सोमवारी विठ्ठल-रुख्मिणी मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या मासिक बैठकीत घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच अख्तर शेख तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच महेंद्र खोतकर, ग्रामसेवक नारायण रावते यांची उपस्थिती होती.
१७ जूनपासून तीन दिवस जनता कर्फ्यू लागू झाल्यानंतर या वेळी रुग्णालय व औषधी दुकाने वगळता इतर सर्वच बंद असणार आहेत. आदेशाचे उल्लंघन करून दुकाने सुरू ठेवणाऱ्यांकडून ५ हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. मास्क न वापरता सार्वजनिक ठिकाणी वावरताना आढळून आल्यावर २०० रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. आरोग्य विभाग व आशा कार्यकर्त्या यांच्यातर्फे प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून नागरिकांना औषधीचे वाटप केले जाणार आहे. गावात नव्याने चार आरोग्य सेवकाची नेमणूक करण्यात यावी यासाठी जि.प. प्रशासनाकडे पाठपुरावा करणे, खासगी डॉक्टरांची सेवा घेणे आदी निर्णय सभेत घेण्यात आले.