धनंजय मुंडे प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी केली पोलिसांकडे सत्य समोर आणण्याची मागणी
मुंबई – राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावरुन भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. नैतिकतेच्या आधारे धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी भाजपा नेते करत आहेत. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणावर भाष्य केलं असून पोलिसांनी सत्य समोर आणलं पाहिजे असं म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
वाचा :-नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरात एनसीबीचे छापे
“धनंजय मुंडे यांनी स्वत: आपल्या फेसबुक पोस्टमधून काही कबुली दिली आहे. त्यामुळे नैतिकतेच्या आधारे त्यांच्या पक्षाने त्या कबुलीच्या संदर्भातील विचार करणं गरजेचं आहे. त्यातील जी कायदेशीर बाबींचा विचार केला पाहिजे. एक म्हणणं त्या मुलीचं आहे, एक म्हणणं धनंजय मुंडे याचं आहे. आपण कोर्टात गेल्याचं धनंजय मुंडे सांगत आहेत. असं संशयाचं वातावरण राहणं योग्य नाही. तात्काळ पोलिसांनी सत्य बाहेर आणलं पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपानं आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या व भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.